आपली नाटकं आणि सिनेमांमधून अत्यंत निखळ विनोद सादर करत धमाल करमणूक करणाऱ्या रघुनाथ दामोदर ऊर्फ वसंत सबनीस यांचा आणि अत्यंत उत्कट कविता करणारे कवी ना. वा. टिळक यांचा सहा डिसेंबर हा जन्मदिन. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी.... ..................
वसंत सबनीससहा डिसेंबर १९२३ रोजी जन्मलेले रघुनाथ दामोदर हे ‘वसंत सबनीस’ या नावानेच नाटककार आणि विनोदी लेखक म्हणून विख्यात होते. मराठीत मुलांसाठी असलेली मासिकं फार चालत नसताना त्यांनी मात्र ‘किशोर’ सारख्या अत्यंत दर्जेदार मासिकाच्या संपादनाची धुरा अनेक वर्षं समर्थपणे सांभाळली आणि अंक उत्तम चालवला.
त्यांनी अनेक धमाल विनोदी एकांकिका आणि ‘विच्छा माझी पुरी करा’सारखं तुफान लोकप्रिय वगनाट्य लिहिलं. वसंत सबनीस हे नाव हिट झालं. त्यांनी ‘पुलं’ आणि ‘दादा कोंडके’ यांच्याबरोबर नाटकात कामंसुद्धा केली होती.
अप्पाजींची सेक्रेटरी, घरोघरी हीच बोंब, सौजन्याची ऐशीतैशी, कार्टी श्रीदेवी, गेला माधव कुणीकडे यांसारखी धुमाकूळ नाटकं आणि एकटा जीव सदाशिव, गोंधळात गोंधळ, खिचडी, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, एकापेक्षा एक, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी असे धमाल सिनेमे त्यांनी लिहिले. आणि ते सर्वच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते.
‘खांदेपालट’ आणि ‘थापाड्या’ हे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत.
१५ ऑक्टोबर २००२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
(वसंत सबनीस यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) ......
नारायण वामन टिळक सहा डिसेंबर १८६१ रोजी करंजगावमध्ये (रत्नागिरी) जन्मलेले नारायण वामन टिळक यांनी वयाच्या ३४व्या वर्षी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि पुढे आपल्या मृत्युपर्यंत त्या धर्माचा प्रचार केला. त्यांना ‘रेव्हरंड’ ही पदवीही मिळाली होती.
लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचं मराठीखेरीज संस्कृत, हिंदी आणि इंग्लिशवर प्रभुत्व होतं. त्यांच्या मातोश्री जानकीबाईंना पद्यरचनेचा नाद होता आणि तेच बाळकडू मिळून ते कवी बनले. त्यांनी शंभरावर भक्तिगीतं, ओव्या आणि अभंगांची रचना केली. त्यांनी ‘ख्रिस्तायन’ नावाचे ओवीबद्ध काव्य त्यांनी लिहायला सुरुवात करून साडेदहा अध्याय पूर्ण केले होते. ‘गुलाब’, ‘शुष्क गुलाब’, ‘रानात एकटेच पडलेले फूल’, ‘वनवासी फूल’ अशा त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. ब्रिटानिया काव्य आणि शीलं परं भूषणम् ही त्यांची नाटिकासुद्धा गाजली होती.
त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनीसुद्धा नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातल्या आठवणींवर लिहिलेलं ‘स्मृतिचित्रे’ प्रचंड गाजलं. नऊ मे १९१९ रोजी त्यांचं निधन झालं.
१४ एप्रिल १८९१ रोजी महूमध्ये (इंदूर) जन्मलेले डॉ. भीमराव रामजी ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर हे कायदेपंडित, समाजसुधारक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.
भारताच्या ‘संविधानाचे शिल्पकार’ असं त्यांना आदराने म्हटलं जातं. त्यांनी दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतिकारी लोकांचे ते प्रेरणास्थान बनले.
त्यांनी मुख्यतः इंग्लिश भाषेतून लेखन केलं आहे. २२ पुस्तकं, १० अपूर्ण ग्रंथ, १० शोधनिबंध आणि अनेक लेख, परीक्षणं असं विपुल लेखन त्यांनी केलं आहे.
सहा डिसेंबर १९५६ रोजी त्यांचं दिल्लीमध्ये निधन झालं.
१४ एप्रिल १९९० रोजी त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च्च नागरी पुरस्कार मरणोत्तर देऊन गौरवण्यात आलं होतं.